Saturday, August 23, 2025

भाग १५ : ताराबाई

वारी पुढे चालू लागली. कुठे टाळ्यांचा गजर तर कुठे टाळ वाजू लागले. लहान मोठे, तरुण, वृद्ध सगळ्या वयोगटातील लोक मनात असंख्य गोष्टी घेऊन पुढे चालत होते. त्या चालण्यात कोण पहिला , अशी शर्यत नव्हती. लोक फक्त चालत  होते. काही जिंकायचे नव्हते. काही गाठायचे नव्हते. अनोळखी चेहरा सुद्धा नमस्कार करून जात होता. कुठल्या नात्याची गरज नव्हती. भक्तीची नाळ फक्त सर्वाना जोडत होती. चालता चालता सूर्य डोक्यावर आला. कडकडीत ऊन पडलेले. पोटात कावळे ओरडू लागलेले . सकाळी सकाळी टपरीवर गरमा गरम चहा झाला त्याच्याच ऊर्जेवर हे पाय एवढा वेळ चालत होते. आता मात्र सकाळ पासूनचा उपवास सहन होत नव्हता.  वारी पुढे पुढे जात होती . वाटेत एका वळणावर कोण्या एका गृह उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची सोय केली होती. दहा बायकांचा समूह पण बऱ्याच जणांची भूक त्यांनी अशी भागवली. इशाचा ग्रुप सुद्धा त्या प्रसादाच्या रांगेत लागला. आमटी भात, कडधान्यांची उसळ, एक लाडू असं सगळं प्रसाद म्हणून ताटात आलं आणि सगळे ते पूर्ण ब्रह्म समजुन पोटभर जेवले. जेवणानंतर पुन्हा चालायला सुरुवात झाली. नलिनी आणि इशा गप्पा मारत चालत होत्या. चालता चालता अचानक पाऊस आला. मग रस्त्यावर थोडी धावपळ सुरू झाली. त्यात सर्वांकडे छत्र्या, रेनकोट असेलच असे नाही मग कुठे आडोसा शोध, एखादं झाड, दुकानाचं एखादं छप्पर लोक शोधू लागले. इशा, नलिनी कडे छत्री होती. पण पावसाचा जोर वाढला तसे ते ही ही एका ठिकाणी आडोशाला थांबले. ते जिथे थांबले तिकडे समोरच एक बाई मुर्त्या विकत होती. नववारी लुगड्यात आपले बस्तान सांभाळणारी ती... ताराबाई. हातात छत्री घेतलेली आणि आपल्या मांडलेल्या मुर्त्या पावसामुळे खराब होऊ नये म्हणून तिची चलबिचल सुरू होती. तिच्या समोर मांडलेल्या सगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्त्या होत्या. दुरून दिसताना त्या फार आकर्षक भासत होत्या म्हणून मग इशा आणि नलिनी ताराबाई जवळ आले. 

ताराबाईची पावसामुळे पुरती तारांबळ उडाली होती. पावसाचे पाणी तिच्या छत्रीवर , तिच्या मांडलेल्या सर्व दुकानावर पडत होते. ते वाचवता वाचवता पावसात ती मात्र पूर्ण भिजत होती. त्या दोघी जसे जवळ आले तशी ती त्यांच्या वर थोडी खेकसलीच, 

" काय हवंय तुम्हांसनी ... दिसत न्हाई व्हय ... या पावसानं कसे वाटोळं केलं ... असा अचानक कशापायी आलाय रे  ... तुला दया येत न्हाई का आम्हा गरिबांची... " - ताराबाई 

पाऊस आल्याने तिचा पारा चढला होता. तिला शांत करण्यासाठी नलिनी म्हणली,

" बाई पावसाळा आहे तर तो येणारच ना... तुम्ही शांत व्हा "

" कसे शांत व्हायचं ग बाय ... त्याला जिथे पडायचं, जवा पडायचं तवा तो दडी मारतोया ... तिकडे पड म्हणावं जिथे त्याची वाट बघून लोक येडी पिशी व्ह्तायत , आम्हाला कशा पायी तरास द्यायला , माझं घर वाहून नेल, आयुष्याची कमाई नेली आता या विठ्ठलाला बी न्यायला आलाय काय त्यो पाऊस...!

तिच्या बोलण्या वरून पाऊस तिला नकोसा च झालेला हे स्पष्ट दिसत होते. काहींच्या पावसातल्या हिरव्या, रंगीत, कोवळ्या आठवणी असतात. कधी प्रेमाच्या तर कधी उत्साह उमेद देणाऱ्या पण त्या बाईने जवळ जवळ पावसाला दारावरच्या उंबर्यावरच ठेवलं होतं. अगदी विठ्ठल विटेवर पावसातच उभा आहे अशी ती पावसावर रागावली होती.
नावडतीचा पाऊस या वारीत त्या ताराबाईनी रेखाटला होता.
इशाने तिच्या सॅक मधून एक मोठा रुमाल काढला आणि ताराबाईला तो दिला. 

" बाई तुम्ही पूर्णपणे भिजला आहात, हा रुमाल घ्या आणि पुसून घ्या, तुम्ही विठ्ठलाच्या मूर्ती विकत आहात ना मग जर त्या विठ्ठलानेच या पावसाला बोलावले असेल तर ... " - इशा

"आपण कदाचित चुकीच्या जागी असलो तर त्या पावसाची त्यात चूक काय ... मला अस वाटतंय इथून थोडं मागे गेल्यावर तिकडे गृह उद्योग चालवणार्या महिला प्रसाद देऊन वारकर्यांना तृप्त करत आहेत. तिथे बरीच जागा आहे आणि सतत वारकरी तिथे येतायत तुम्ही या मुर्त्या तिकडे का नाही घेऊन जात. तुम्हाला डोक्यावर सुरक्षित छप्पर ही मिळेल आणि तुमच्या मुर्त्या पण विकल्या जातील. " - इशा

बघता बघता ताराबाई शांत झाली. तिच्या डोळयातून पाणी यायला लागले. पावसाचा जोर कमी झाला होता. तिने त्या सर्व मांडलेल्या मुर्त्या उचलायला सुरुवात केली. तिच्या एकटीने ते काम होत नाही असे दिसल्यावर इशा आणि नलिनीने काही सामान त्यांच्या हातात घेतले. 

बाई हातात मावेल तेवढं घेऊन त्या ठिकानी निघाली. मागे तिचे उरलेले मुर्त्या पावसाच्या पाण्यात भिजत होत्या. ते बघून जवळची चालणारी माणसे उचलून घेत होते. गृह उद्योग समूहाच्या मुख्य कार्यकारी बाईंशी बोलल्यावर त्यांनी लगेच ताराबाईला जागा उपलब्द करून दिली. आणि बघता बघता अगदी तसेच दुकान तिथे मांडले गेले. त्यात ही आश्चर्य म्हणजे इशा नलिनी नंतर ज्यांनी ज्यांनी त्या मुर्त्या उचलल्या त्या सर्व मुर्त्या ताराबाईकडे परत आल्या. त्या सुबक मुर्त्या जेवढ्या तिथे मांडलेल्या बरोबर तेवढ्याच इथे विठ्ठलाच्या  मुर्त्या होत्या. इशा आणि नलिनीला या गोष्टीचे नवल वाटले. कोणी ही आपल्या सामानात लपवून घेऊन जाऊ शकत असताना ही तसे झाले नाही. ज्यांनी ज्यांनी त्या मुर्त्या ताराबाई ला दिल्या त्या सर्वांना नमस्कार करून ताराबाईनी आभार मानले. इशा नलिनी च्या ही पायांना स्पर्श करत ताराबाई बोलू लागली,
" माझी मुक्ताईच आज तुमच्या रुपात आली. माझ्याकडून हे घ्या, एक विठ्ठल रखमा मूर्ती , न्हाई म्हणू नका, मी लय पिरमाने देतेय. किर्पा करा पण ही माझी आठवन समजून घ्या " 
इशा नलिनी ने ती मूर्ती घेतली आणि ताराबाईला नमस्कार करून दोघी पुन्हा वारीत सामील झाल्या. 

क्रमशः 

Friday, August 22, 2025

भाग १४ : मंजिऱ्या

दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे डोळ्यावर पडताच इशाला जाग आली. सगळे अजून झोपलेलेच होते. त्याची वारी स्वप्नात सुरू झाली असावी आणि त्याचा ते आनंद घेत होते असे सगळे गाढ झोपेत होते.  वारीचा सोहळा पाहण्यासाठी आणखी उशीर नको म्हणून इशाने च शेवटी सर्वांना उठवले. एकाच मोठ्या खोलीत सर्वांची रात्रीची सोय केलेली त्यामुळे एका मागोमाग एक असे सगळेच उठले. मग सकाळच्या सर्व विधी, आंघोळी करून निघण्यासाठी हा युवा वारकरी वर्ग तयार झाला. जिथे त्यांची राहण्याची व्यवस्था होती तिथून अर्धा तासाच्या अंतरावर ज्ञानेश्वर पालखी येणार होती. तिथं पर्यन्त पोहोचण्यासाठी मग टेक्नॉलॉजीचा वापर करत , गुगल मॅप वरून त्यांनी वारीला सुरूवात केली. दहा जणांचा हा समूह पालखीच्या दिशेने प्रस्थान करत होता. मुलींनी कोणी इरकल नेसलेली. कोणी नववारी काष्टा, मुलांनी पांढरा सदरा, सुती धोतर आणि गांधी टोपी असा वारकरी पोशाख केला होता. जस जसे इच्छित ठिकाण जवळ येत होते. टाळ वाजू लागले होते. त्याचा आवाज हळूहळू वाढत होता. 
अखेरीस समोर पालखीचे दर्शन झाले. अफाट गर्दी पालखीच्या आजूबाजूला दिसत होती. प्रत्येकाची धडपड त्या पालखीला स्पर्श करण्याची. नमस्कार करण्याची. पालखी तिथे येऊन तसा बराच काळ झाला पण गर्दी काही कमी होत नव्हती. इशा आणि नलिनी ने त्या गर्दीत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केलेच तेवढ्यात पालखी तिथून निघण्याची वेळ झाली. आपल्या पुढच्या मार्गात पालखी सोबतच जायचे होते त्यामुळे त्यानी ही तो प्रयत्न थांबवला. आणि इतर सर्वांसोबत चालू लागल्या. पालखी पुढे निघाली. 

पुढे गेल्यावर एका वळणावर इशा थांबली. एक मोठा माणसांचा घोळका समोर होता. नलिनीने अंदाज घेतला आणि इशा सोबत त्या घोळक्यात शिरली. एका सुटाबुटातला माणूस आणि त्याच्या भोवती हा घोळका जमला होता. मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर असावे अशी त्याची देहबोली होती. पण आजूबाजूला पाहिले तर कसली जाहिरात नाही किंवा कंपनी चे बॅनर नाही. 
त्या माणसाकडे रोपट्यानी भरलेली गाडी होती. जवळपास शंभर हुन अधिक तुळशीचे रोप त्या सोबत थोडी माती असं त्यांनी आपल्या सोबत आणलं होतं. जो जो जवळ येत होता त्याला तो त्यातले एक तुळशीचे रोप देत होता. लहान मोठे कोणी ही येऊ दे त्याने ते रोपटे दिले. घेणाऱ्या प्रत्येकाला त्याने एवढंच सांगितले.
 
" जिथे जिथे विठ्ठलाचे पाय असतील तिथे तिथे हे रोप लावा. वारी पूर्ण होत असताना ही एक माझी इच्छा पूर्ण करा. असे म्हणून त्याने भराभर सर्व आणलेले रोपं देऊन टाकली. गर्दी हळूहळू पुढे सरकली. त्याने आपले हे बस्तान आवरायला घेतले.  तेव्हाच इशा त्याच्याजवळ गेली. त्याला विचारले 

" तुम्ही नक्की कोण, आणि ही एवढी रोप तुम्ही आणली आणि जो मागेल त्याला देत गेलात. बघता बघता ही गाडी रिकामी झाली. ही रोप कशासाठी देताय सर्वाना. 
त्यावर त्या इसमाने बोलायला सुरुवात केली. 
" मी एका पुण्यातल्या कंपनीत मॅनेजर आहे. माझ्या मुलीला जन्मापासून एक दुर्धर आजार  झाला होता. कोणत्याही औषधाने तो बरा होणार नाही असे मोठ्या मोठ्या डॉक्टर कडून ऐकले होते. ती अल्पायुषी आहे हे ऐकताना माझे कान सुन्न व्हायचे. "

तिचा फोटो त्यांनी आम्हाला दाखवला. इन मिन चार पाच वर्षाची ती होती. जेव्हा सगळे डॉक्टर झाले. कुठलेही औषध कामी आले नाही तेव्हा या तुळशीच्या पानांनी तो चमत्कार करून दाखवला. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली 
" एका आयुवेदीक डॉक्टरकडे गेल्यावर त्याने आम्हाला ते औषध घरीच कसे करून घ्यायचे ते सांगितले. गेले सहा महिने माझी मुलगी ते घरी तयार केलेलं औषध घेते होती. तिला जेव्हा आम्ही पुन्हा त्या डॉक्टर कडे घेऊन गेलो. आम्हाला कळले की ते डॉक्टर काही दिवसांपूर्वी दवाखाना बंद करून गावी  निघून गेले. आम्ही तेव्हा थोडे घाबरलो ही होतो. पुढे काय होणार ते कळत नव्हते. शेवटी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिचे रिपोर्ट काढले आणि ते डॉक्टरांनी पाहिले,  तेव्हा ते एवढंच म्हणले इट्स मिरॅकल...आम्हाला कळले की ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. जेव्हा आमच्या हे लक्षात आले की तिच्या या आजारावर कोणतेही औषध नव्हते फक्त एक तुळशीच्या पानांचे मिश्रण तिच्यासाठी वरदान ठरले आम्हाला ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. आणि तिचा आनंदी चेहरा बघून माझं जे हे देणं आहे ते पूर्ण करण्याची इच्छा मला झाली. ते डॉक्टर मला भेटले तर मी त्यांचे पाय धरले असते. पण आता ते शक्य नाही. त्यांच्या रुपात विठ्ठलच मला भेटला आणि ही संजीवनी मला मिळाली.   मला वाटतंय आपल्या शरीराला आणि मनाला निरोगी ठेवणारी ही तुळस जागोजागी असावी म्हणून हा लहानसा प्रयत्न .  मी गेले तीन दिवस इथे येऊन उभा राहतो. पुढे जोवर वारकरी या वाटेने येत जातील मी इथे येईन आणि ही तुळस त्यांना देईन.  " 

त्यांचे हे बोलणे संपत आले. इशाने त्यांच्याकडे स्वतः साठी ही तुळस मागितली. परंतु होते ते सर्व रोप संपून गेले होते. तेव्हा त्यांनी गाडीत पडलेल्या मंजिऱ्या गोळा केल्या आणि म्हणले या मंजिऱ्या च घे ग मुली, त्यातून येईलच नवीन तुळस. इशा ने त्या मंजिऱ्या घेतल्या आणि ती पुढे निघून आली. त्यांची गाडी हळूहळू तिथून दिसेनाशी झाली. त्या मिळालेल्या मंजिऱ्या तिने आपल्या पर्स मध्ये कागदात गुंडाळून ठेवल्या. 

नलिनी तिच्या पासून वेगळी झाली होती. नलिनीला शोधणे तसे इशा साठी अवघड नव्हते. दोघीनी पालखी सोडायची नाही हे आधीच पक्के केलेले. त्यामुळे इशाने धावत पळत पालखी गाठली. नलिनी तिला तिथेच भेटली. नलिनीने इशाला विचारले 
" कुठे होतीस ग इशा ? " 
" अग इथेच तुझ्या मागेच होते, आता सोबत च जाऊ पुढे " - इशा
" हो माझा हात च पकड तू घट्ट , नाही तर अशीच कुठे तर पुन्हा गायब होशील " - नलिनी
दोघी हातात हात धरून पुढे गेल्या. 

क्रमशः

Thursday, August 21, 2025

भाग १३ : वारीला सुरुवात

आज तो दिवस होता. इशा तिच्या प्रवासाला सुरुवात करणार होती. सकाळचे सात वाजले होते. पाण्याची बाटली आणि थोडा सुका खाऊ सुनीताने तिला सोबत ठेवायला दिला. एका डब्यात पराठे करून दिले. प्रवासात काही राहून जाऊ नये म्हणून सगळ्या वस्तू पुन्हा तपासल्या. तेवढ्यात नलिनीच्या घरून फोन आला. नलिनीने तिला निघण्यास सांगितले. 
इशा देवाला नमस्कार करून आईला नमस्कार करून निघाली. निघताना सुनीताने इशाला आलिंगन दिले. तिला काळजी घ्यायला सांगितले. " लवकर परत ये " हे सांगताना तिचा आवाज कापरा झाला होता. 

इशाला समजले आता आपण निघायला हवे नाही तर इथून आपला पाय निघणे अवघड होईल. आईसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. 

इशा निघाली. ठरल्या प्रमाणे दोघी टी स्टोल जवळ भेटल्या. तिथून लगेच एस टी स्टॅण्ड गाठले. योगायोगाने त्यांना जी एस टी हवी होती ती समोर च उभी होती. एस टी जवळ आल्यावर त्यांना त्यांचा कॉलेजचा ग्रुप सुद्धा भेटला. जवळ जवळ सगळेच आले होते. एस टी मधले दहा बारा जण सोडले तर सगळे या ग्रुप मधलेच, त्यामुळे जशी एस टी जागेवरून हलली. तसे कुठून तरी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..." सुरू झाले. सर्वांनी त्या सुरात सूर मिसळला आणि एस टी सुरू झाली. 

प्रवासाला सुरुवात झाली. तसे इशाने आपली खिडकीची सीट धरली. पाहता पाहता घाट रस्त्याला सुरुवात झाली. बाहेरचे वातावरण नवीन ऊर्जा देत होते. हिरव्या रंगानी झाकलेले डोंगर पठार, मधेच थंड वाऱ्याची झुळूक, त्यात अचानक आलेली पावसाची सर सर्वांना ताजेतवाने करत होती. 
अशातच इशाला त्या पुस्तकाची आठवण झाली. नलिनी शेजारी बसून  मोबाईलवर गाणी ऐकत होती. इशाकडे मोबाईल नसल्याने तिच्या कडे पुस्तकाशिवाय दुसरा विरंगुळा नव्हता. तिने आपल्या सॅक मधून विनयने दिलेले पुस्तक काढले. तिने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. 

गाडी पाहता पाहता लोणावळ्याजवळ पोहोचली. इशा ते पुस्तक वाचण्यात गढून गेलेली. ते पुस्तक नेमके वारीच्या प्रवासात वाचायला घेतले आणि पुस्तकात ही तसाच एक प्रवास होता. ज्या प्रवासात एक प्रवासी निघाला आणि त्याला वेगवेगळी माणसे भेटत गेली आहेत. त्या माणसांविषयी, भेटलेल्या माणसांच्या गोष्टी त्यात लेखकाने लिहिलेल्या होत्या. 

त्या लेखकाला प्रवासात सुरुवातीला भेटलेला साधू , ज्याने आपले सर्व घर दार सोडून आपल्या कुटुंबापासून लांब एका मठात राहण्याचे ठरवले. तो खुप लांबचा प्रवास करून तिथवर पोहोचला आणि त्या मठात पुढचे उरलेले आयुष्य घालवायचे असे ठरवले होते. या साधूने कोणाला ही उपदेश केला नाही किंवा बुवाबाजी केली नाही. तो त्या मठाच्या प्रवेश द्वारावर सकाळी येऊन बसत आणि त्या मठात येणाऱ्या लोकांना एक झाडाच्या बियांची भरलेली पिशवी देत. ती पिशवी देताना सांगायचा " जिथे माती मिळेल तिथे या बिया  मातीत टाका." त्या बीयांची खासियत अशी कि मातीच्या नुसत्या स्पर्शाने त्यांना अंकुर येत आणि पाहता पाहता त्याचे रोपटे वाढत जाई. मोफत हा व्यक्ती असे का देतोय असा प्रश्न त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पडला कि त्यातले बरेच लोक मठाच्या बाहेरच ती बीयांची पिशवी टाकून देत. त्यामुळे मठाच्या आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार झाला होता. त्याचे हे कार्य बघून मठातले लोक ही त्याला त्याच्या जागेवरून उठवत नसत. लेखकाला त्याचे हे कार्य जगावेगळे वाटले आणि त्याने त्या व्यक्तीला शब्दात मांडले. 

साधूचे हे वर्णन पूर्ण होई तोवर गाडी एका ठिकाणी थांबली. तिथे चहा नष्ट्या साठी पाच दहा मिनिटे मिळाली. काही जण गाडीतून खाली उतरले तोच त्या गाडीत वारकरी पोशाखातले दोघे जण चढले. गाडी सुरू झाली. नव्याने बसलेले ते वारकरी टाळ घेऊन आलेले. त्यांच्या गायनाला सुरुवात झाली. एका मागोमाग एक असे वेगवेगळे तुकोबाचे अभंग म्हणणे सुरू होते. गाडीत त्यांचाच नाद घुमत होता त्यामुळे इशाने पुस्तक थोडा वेळ बाजूला ठेवले. पुण्यात गाडी येईपर्यंत त्यांच्या गायनाची ऊर्जा कमी झाली नव्हती. 

पुढे येणाऱ्या स्टॉप वर इशा आणि त्यांचा ग्रुप उतरणार होता. शेवटी एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल हा जय घोष झाला आणि त्या दोन वारकऱ्यासकट च  इशाचा ग्रुप खाली उतरला. 

जाता जाता त्या वारकर्यांनी वारीत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्व ग्रुप सोबत एक फोटो झाला. सगळे युवा वारकरी त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी निघाले. पुण्यातील रस्त्यावर बराच वेळ चालले. तिथले हॉटेल, दुकानं पाहिली. संपूर्ण दिवस बाहेर घालवल्यावर सगळे आपापल्या जागी दहा - अकराच्या ठोक्याला च झोपून गेले. इशाने दिवसभराचा अनुभव तिच्या डायरीत लिहिला. ती ही झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना जिथे पालखी येऊन थांबणार होती त्या ठिकाणी जायचे होते. त्याच उत्साहात रात्र सरली. 

क्रमशः 

Wednesday, August 20, 2025

भाग १२ : पूर्व तयारी

    वारीसाठी सर्वांनी भेटण्याचे ठिकाण ठरले. वारीच्या या वेगळ्या अनुभवाला घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक होते. इशाची तयारी सुरू झाली. वारीतला अनुभव आपण लिहून ठेवायचा तिचा संकल्प होता.  त्यासाठी तिची डायरी सुद्धा तयार होतीच. नलिनी दुपारी घरी आली. दोघींमध्ये बराच वेळ गप्पा सुरु होत्या. वारीत काय काय करायचे ? याची यादीच दोघीनी तयार केली होती. हा अनुभव शहरातल्या मुलांना क्रेझी करणारा असतो आणि तसेच त्यांच्या पूर्ण कॉलेज ग्रुपचे वारे होते. नलिनीला इशाने सोबत घेतलेले सर्व साहित्य दाखवले. अजून काही राहायला नको आणि राहिलेच तर ते नलिनी आणेल असा तिचा मानस होता. त्यामुळे नलिनीने तसेच कमी अधिकचे सामान सोबत घेतले. नलिनीला त्या सामानात विनयने दिलेले पुस्तक मिळाले. तिने इशाला विचारले,

" हे कुठले ग पुस्तक ... ? "
 
" तू वारीत पण पुस्तकांचे वाचन करशील ? " 

" अग हे पुस्तक मी अजून वाचायला सुरुवात केलीच नाही. मला भेट मिळालेले हे पुस्तक म्हणले प्रवासात मोकळ्या वेळेत वाचेन म्हणून घेते." - इशा

" इशा ... पुस्तकाच्या बाहेरच्या जगातली गंमत तू मिस करशील ग ... नको ना हे पुस्तक वगैरे ... तिकडे खूप मजा करू आपण " - नलिनी

" अग नलू, मी काही सतत वाचत बसणार नाही. खूप कंटाळा आला तर च वाचेन ... चालेल " - इशा 

" म्हणजे माझा कंटाळा येईल तेव्हा ना ... " - नलिनी

नलिनी इशाकडे बघून हसायला लागली. इशाला तिचा टोमणा कळला होता. दोघीनी पण ही गोष्ट खेळीमेळीत घेऊन पुढचे प्लॅनिंग नक्की केले. 

" मुंबई मधून आपण एस टी ने जाणार आहोत. पर्वा सकाळी आपल्याला डेक्कन टी पॉईंटला भेटायचे तिथून एकत्र एस टी डेपोला जाऊ. सगळे तिकडेच येतील. त्या दिवशी पुण्यात थांबायचे आहे. आपल्याला एका ठिकाणी राहावं लागेल. त्याची सोय अजित बघतोय. त्याच्या पुढच्या दिवसापासून आपली वारी सुरू होईल. मग धमाल ! " - नलिनी

" इशा आपण थोडं पुणे सुद्धा एक्सप्लोर करूया पुन्हा कधी अशी आपल्याला एकत्र संधी मिळेल ? 
आणि तिकडे थोडं शॉपिंग पण करू " - नलिनी

" अग आपण वारी साठी जातोय ना मग शॉपिंग कसले ? " - इशा

" असू दे ग , काही आवडले तिकडे तर आठवण म्हणून घ्यायचे ...आणि हो वारीमध्ये गाऊया, नाचूया ते वारकरी करतात ना सगळं करून बघू . "  - नलिनी

" नलिनी हे दोन दिवस कधी जाणार ... आपण एवढी तयारी केलीये की आता कधी एकदा त्या बस मध्ये बसतोय असे झाले. " - इशा

" होय ग इशा..लवकरच येईल तो दिवस डोन्ट वरी, तू आता फक्त बॅग तयार ठेव मग आपण निघालोच वारीला... विठ्ठल वारीला... " - नलीनी

दोघी हसू लागल्या. जवळ जवळ सगळी तयारी वेळे आधीच झाली होती. नलिनी थोड्या वेळात तिच्या घरी गेली. तोपर्यन्त सुनीता घरी आली. सुनीताने इशाच्या खोलीत जाऊन पाहिले. तिने तिचे सामान बॅग मध्ये भरून ठेवले होते. तिचा चेहरा पूर्वीसारखाच खुलला होता. कुठे बाहेर जायचे म्हणजे सुनीता आणि रमाकांत तयार व्हायच्या आधी इशा तयार असायची. त्यांच्या आधीच इशा गाडीत जाऊन बसायची. इशाला असे आनंदी पाहुन सुनीताला समाधान मिळत होते. मनातल्या मनात तिने विठ्ठलाला इशाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रार्थना केली. 

दोघी चहा पीत होत्या. गप्पा ही सुरु होत्या. तेव्हा सुनीताला आठवण झाली. ती आत स्वयंपाक घरात गेली. सुनीताने देव्हाऱ्यातून इशाला तुळशी माळ आणून दिली. सुनीता म्हणली,

" ही तुळशी माळ तुझ्या बाबांनी एकदा आणली होती. त्यांच्या मित्रांसोबत ते पंढरपूरला गेलेले तेव्हाची गोष्ट आहे. ती माळ तू तुझ्याजवळ ठेव. वारी मध्ये चालताना गळ्यात घाल. तुझ्याजवळ असली म्हणजे मी समजेन की तुझे बाबा च तुझ्या सोबत आहेत. " 

सुनीता भावूक झाली. तेव्हा इशाने ती माळ घेतली. तिच्या गळ्यात तेव्हाच घातली आणि म्हणली, 

" आई , हे बघ आता पासूनच बाबा माझ्या सोबत आहेत. तू काळजी करू नको, आता ते माझी काळजी घेतील. " 

इशा सुनीताच्या कुशीत शिरली आणि तिने सुनीताला घट्ट मिठी मारली. 

क्रमशः

Tuesday, August 19, 2025

भाग ११ : घर ते वारी

इशा सुनीता जवळ जाऊन बोलू लागली. नलिनी ही समोरच बसलेली होती. सुनीताने चहा चा कप बाजूला ठेवला. 

" आई , मला वारीला जायचे, वारीचा अनुभव घ्यायचा आहे. मी कधीच तुम्हा दोघांना सोडून दूर राहिले नाही. मला हे धाडस करून पाहायचे. त्यातही वारी हा सगळ्यात वेगळा अनुभव माझ्यासाठी असेल.  आठवडाभरच हा कार्यक्रम असेल ग आई, नंतर मी फक्त अभ्यास करीन आणि परीक्षेनंतर एखादी नोकरी करीन. तुला मदत करीन. पुढच्या आव्हाना ना स्विकरण्यासाठी मला हवी असणारी शक्ती या अनुभवातून नक्की येईल.  मला खात्री आहे. मला त्या वारीत भेटलेल्या देवाला सोबत घेऊन यायचे आई, आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घ्यायचेत... प्लिज मला जाऊ दे, नलिनीसुद्धा माझ्या सोबत असणार आहे...सगळे कॉलेजचे मित्र मैत्रिणी चालल्यात. मी एकटी नसणार आई. "

इशाने नलिनीकडे पाहिले, त्यावर तिने ही काही बोलावे या अपेक्षेने ती नलिनीला खुणावत होती. 
तो इशारा समजून नलिनीने ही इशाला दुजोरा दिला. 

" काकू, इशाला पाठवले तर माझे ही घरचे निश्चितपणे जायला संमती देतील. इशाला पाठवा ना काकू...मी आणि आमच्या कॉलेजमधले काही मित्र मैत्रिणी ही असणार आहेत, आम्ही  दोघीच नसू , आमचा पूर्ण ग्रुपच जाणार आहे, फक्त इशा नव्हती त्यात..." 

विनवणी करून शेवटी सुनीताला दोघीनी मिळून राजी केले. सुनीताला इशाची काळजी होती पण तिला तिच्या जबाबदाऱ्या, समाजातील चांगल्या वाईट गोष्टी या बाहेरच पडल्यावर व्यवस्थित कळतील या आशेने, या समाजात वावरण्याचे धाडस तिच्यात येण्यासाठी सुनीताने इशाला जाण्यासाठी होकार दिला. 

दोघी एकदम खुश, आज बऱ्याच दिवसांनी इशाच्या चेहऱ्यावरची चमक परतल्यासारखी वाटतं होती. तिच्या मनातला आटलेला ऊर्जेचा झरा पुन्हा योग्य मार्गाने वाहू लागला होता. नलिनी चहा पिऊन तिथून निघाली. इशाने तिला कानात थँक्स म्हणले आणि नलिनीला निरोप दिला. 
इशा सुनीता जवळ आली. सुनीताने इशाकडे पाहिले नेहमी पेक्षा आज ती वेगळीच वाटली. सुनीताने त्या मागचे कारण विचारले. त्यावर इशाने आज दुपारी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. सुनीता आधी इशाला म्हणली, थोडी ओरडलीच ..."  ओळखीचे नसताना तू दार का उघडले इशा ... असे कोणी घरात घुसून तुला काही केले तर ... अशी कशी ग तू भोळी... " 

त्यावर इशा म्हणाली, " आई मी लगेच दार नाही उघडले... सुरुवातीला मी बंद दारा अडून त्यांना पाणी दिले मग त्या मुलाने कीर्तन च सुरू केले तर मला ते ऐकून त्याला खायला द्यावेसे वाटले..." 

"  असे का ? बरं " - सुनीता

" ती माणसे अनोळखी, आज काल कोणाचा भरवसा देता येत नाही ... मग दिलेस ना त्याला खायला ... काय दिलेस ?  " - सुनीता

" दहीभात " - इशा

" दहीभात दिलास , छान ...विठ्ठलानेच दर्शन दिले म्हणायचे आता... बरे केलेस " - सुनीता

" चल आता ... ती आणलेली मेथी निवडून दे. मी देवासमोर दिवा लावते. मग रात्रीचे जेवण करायला घेते." 
इशाने भाजी काढली आणि निवडायला बसली. तिच्या डोळ्या समोर आता फक्त वारी होती आणि विनयने दिलेल ते पुस्तक...

क्रमशः 

Monday, August 18, 2025

भाग १० : दही भात

       दुपारची वेळ होती. घरी कोणी नव्हते. इशा एकटीच घरी होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.  इशाने बाहेर डोकावले. दोन बायका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दारात उभ्या होत्या.  त्यांना पाणी हवे होते म्हणून त्यांनी दार वाजवले होते. 

इशाने त्यांना सुरुवातीला बाहेरच थांबायला सांगितले. नंतर ती किचन मधून पाणी घेऊन आली. त्यांना पाणी दिले. त्या बायका पाणी पिऊन निघतच होत्या तेवढ्यात एका लहान मूलाने त्यांना बाजूला केले आणि इशाच्या समोर आला.  त्याने इशाकडे खायला मागितले. तिला कळेना आता काय करावे. त्यातल्या एका बाईने त्याला खांद्याला धरून मागे घेतले आणि म्हणले, 

" तुला भूक लागली व्हय... थांब थोडं पुढं मिळेल काही खायला...विन्या " 

विनय हा छोटा वारकरी वाटत होता. पांढरा सदरा, डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ आणि गव्हाळ वर्ण. साडे तीन चार फूट उंची, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर वारीतला उत्साह घेऊन तो समोर उभा होता. लहान भावाने जसे बहिणीकडून लाड पुरवावे त्याच सुरात तो इशा सोबत बोलत होता.

" मला आताच भूक लागलीये. तुला मी कीर्तन ऐकवू का ? तू देशील तो माझा प्रसाद ताई..." - विनय 

इशाने त्यांना बसायला सांगितले. विनयने इशासमोर तुकारामांच्या अभंगवाणीतुन काही अभंग आणि त्याचे निरूपण करून दाखवले. त्याच्या बोबड्या शब्दात जीवनाचे सार ऐकताना इशा तल्लीन झाली. वीस मिनिटांनी तिनेच त्याला बोलता बोलता मध्ये थांबवले आणि किचनमध्ये गेली. दुपारचे जेवण जवळजवळ संपलेच होते. भात तेवढा शिल्लक होता. इशाने पटापट स्वतःच्या हातानी दहिभात कालवून ताटात वाढून विनयला दिला. विनय आपल्या चिमण्या हातानी एक एक घास घेताना इशा त्याकडे कौतुकाने पाहत होती. विनयला तो दही भात आवडल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्याला पाहून त्या दोन्ही सोबत आलेल्या बायकांना समाधान वाटले. इशाने आलेल्या बायकांना विनयबद्दल विचारले त्यावर तिला कळले की ते सगळे देहू हुन आले होते. त्यांचा अभंग कीर्तनाचा कार्यक्रम मुंबईतल्या एका मठात आयोजित करण्यात आला होता. नुकताच तो कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा समूह आला, आल्या सरशी वेगवेगळ्या शहरात आणखी कार्यक्रम मिळवण्याच्या शोधात सगळे वेगळे झाले. संधी मिळेल तिथे कीर्तन, भजन सादर करून ते सगळे वारीला एकत्र जाणार होते. विनय देहू च्या मंदिरात रोज भजन, कीर्तन ऐकायला येत. ऐकून ऐकून त्याला ही ती भजने, हरिपाठ, संतवाणी पाठ झाली होती. विनय अनाथ होता. मंदिरातल्या आजी सोबत तो राहायचा. आजीचे वय ऐशीच्या पुढे झाल्याने ती वारीला आली नाही. तिने विनयला त्या समूहासोबत पाठवले होते. हे ऐकल्यावर इशा त्याच्या चिमुकल्या घासाकडे पाहून भावुक झाली. दहीभात संपल्यावर तिने विनय ला विचारले,

" तू हे कीर्तन कुणासाठी करतो सांग ? " - इशा

" मी माझ्या मायसाठी, बापासाठी करतो, " - विनय

" पण, तू तुझ्या आई बाबाना पाहिलेस का...तू तर तुझ्या आजीकडे राहतोस ना... " - इशा

"मी त्यांना पाह्यल नाही. त्यांना ओळखू पण शकणार नाही. पण कीर्तन करताना खूप लोक मला बघतात त्यात ते असतील तर आणि मला त्यांनी ओळखलं तर ...किती आनंद होईल त्यांना. त्यांच्या विनय ला ऐकण्यासाठी एवढी गर्दी जमली हे बघून त्यांना भारीच वाटेल ना..." - विनय

या उत्तरावर ती शांत झाली. पुढे काहीच बोलली नाही. मग आलेल्या बाया उठल्या. त्यांनी इशाला कुंकू लावले आणि विनयला उठायला सांगितलं. विनय उठत उठत म्हणला, 

" मी वारीला निघालो. माझं कीर्तन ऐकायला खुप लोक जमतील तिकडे, तू दहीभात घेऊन तिकडेच ये, मला खुप आवडलाय. माझ्या आजीने हे पुस्तक मला दिलय, वाटेत वाचायला. हे पुस्तक मला नीट वाचता पण येत नाही. तू ठेव हे तुझ्याकडे. वारीत आलीस कि मला दे..अन दहिभात पण आण माझ्यासाठी.. येशील ना ! 

एवढं बोलून ते तिघे ही तिथून निघाले. जाता जाता इशाने डब्यात ठेवलेला बेसन लाडू आणून विनयला दिला. विनय कडचे पुस्तक तिने टेबलावर ठेवले आणि बघता बघता ते तिघे तिथून निघून गेले. इशाने दरवाजा लावून घेतला. तासाभरातच नलिनी घरी आली. नलिनीने इशाकडे पाहिल्यावर आज ती नेहमीपेक्षा वेगळी वाटत होती. खुश होती. इशा तिला आपल्या खोलीत घेऊन गेली आणि ते पुस्तक दाखवले.

" काय झालं इशा ... कोणाचे हे पुस्तक, कसला विचार करते ? " - नलिनी

" मी एक निर्णय घेतला नलू, मी तुझ्यासोबत वारीला येण्यासाठी तयार आहे. आईला मी समजावेन, आपण जाऊ यंदा वारीत " -  इशा

" काय ... हे तू म्हणतेस ! " - नलिनी

" खरंच ...!" - नलिनी

" हो खरंच, मला वारी मधल्या माझ्या बाबांना भेटायचे ... तिथेच कुठे तरी ते असतील ... वारीमध्ये एकमेकांना भेटणारा हा मेळावा मला जवळून पाहायचाय. " - इशा

" हो पण हा अचानक बदल कसा झाला ? " - नलिनी

" बदल नाही ग ... एका गोष्टीची जाणीव झाली. मला विनय ने करून दिली. " - इशा

" हा कोण विनय ? " - नलिनी

या प्रश्नानंतर इशाने दुपारी घडलेला प्रसंग नलिनीला सांगितला. नलिनीने इशाला विचारले, 

" पण तो विनय ... तो तुला पुन्हा भेटणार आहे का वारीत ...
वारीत हजारो लाखो माणसे येतात, तुला माहिती आहे ना इशा..."  - नलिनी

" हो नलिनी... पण मी आता ठरवले जायचेच यंदा ... मी तयारी सुरूच करते. तू ही तुझ्या घरी लवकर सांग..." - इशा

" होय ग इशा... माझ्या घरी सांगितलं तरी घरचे आरामात सोडतील. तू काकूंना सांग फक्त आता " - नलिनी

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. बोलता बोलता सुनीताच्या येण्याची वेळ झाली. इशाने येऊन दरवाजा उघडला. नलिनी आणि इशा दोघींनी तिघींसाठी चहा केला. सुनीताने चहा घेतला.  चहा पिऊन झाल्यावर इशाने वारीला जाण्याचा विषय काढला. 

क्रमशः 

Friday, August 15, 2025

भाग ९ : मायेचा ओलावा


     हळूहळू इशा आणि सुनीताचे रुटीन पुन्हा पूर्ववत होऊ लागले होते. इशाला पुन्हा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा होता. घरी आता कमावणारे कोणीही नव्हते. हळूहळू आर्थिक चणचण भासणार याची सुनीताला कल्पना होती. इशाला परीक्षेत कोणता व्यत्यय नको म्हणून सुनीताने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. एका ठिकाणी पार्ट टाइम टायपिंगचे काम करायला तिने सुरवात केली. इशा तिचे कष्ट आणि तिची होणारी धावपळ पाहत होती. 

तिला फार अस्वस्थ झाल्यासारखे वाटतं तेव्हा ती आपली डायरी खोलून बसत आणि त्यातल्या लिहिलेल्या काल्पनिक चेहऱ्यांना वाचत.  त्यात ती जगण्यातला आनंद शोधत.
 
अचानक एक दिवस जोरदार पाऊस सुरू झाला. इशा नेहमी प्रमाणे तिचा अभ्यास करत बसली होती. सुनीता तेवढ्यात बाहेरून आली. तिच्या सोबत इशाची कॉलेजची मैत्रीण नलिनी होती. नलिनी बऱ्याच दिवसांनी आली होती. इशा तिला बाहेर कुठेच दिसली नाही तिने सुनीताला विचारले, 

" काकू, इशा कुठे दिसत नाही ? " 

" अग ती तिच्या खोलीत बसली असेल. मी आपल्यासाठी चहा करते , तू तिच्या खोलीत जाऊन बघ... "  - सुनीता

नलिनी इशाच्या खोलीत गेली. इशा तिच्याच विश्वात, पुस्तकात एका पानावर होती. सुनीता घरी आल्याचे तिला कळले ही नव्हते. 

नलिनी तिच्या जवळ गेली. तिने इशाच्या खांद्यावर हात ठेवला. इशा भानावर आली. पावसाळा सुरू होता. त्यात बाहेर काळोख झाला होता. इशाने नलीनीकडे पाहिले आणि म्हणाली, 

" नलिनी तू, अशी अचानक कशी इथे ? आणि दरवाजा तर बंद आहे , तू आत कशी आलीस ? "

" अग मी काकूंसोबत आले, तूला भेटायचे होते आणि योगायोगाने मला रस्त्यात काकू भेटल्या मग त्यांच्यासोबतच आले. " - नलिनी

" इशा... कशी आहेस ? " - नलिनी

" मी ठीक आहे ग ... पण आईची खूप धावपळ होते. माझी ही परीक्षा झाली की लगेच मी ही बाहेरचे काम शोधायला सुरुवात करीन. " 

" मला कधी कधी फार गोंधळून जायला होतं नलिनी, अस वाटतं , खूप प्रश्न समोर आहेत पण त्याची उत्तर कोणाला विचारु तेच कळत नाही " - इशा

" खूप विचार करू नकोस इशा, तुला योग्य वेळी सगळी उत्तर मिळतील. रिलॅक्स " - नलिनी

" तुला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे ना मग ते सुरू ठेव... त्यातच तुला तुझी उत्तर मिळतील कदाचित " 

" इशा , मला वाटतं तू काही दिवस इथून बाहेर पडावे. तूला एक सुचवू का ? " - नलिनी

आपल्या कॉलेजच्या ग्रुप मधली काही मुलं मुली या वर्षी वारीला जात आहेत. ते आठवडाभर तो वारीचा अनुभव घ्यायला जातायत , मला वाटतं तू त्यात सहभागी व्हायला हवं... अजून एक दोन आठवडे आहेत. तू यावर विचार कर आणि मला सांग. तू तयार असशील तर मी ही जायचा विचार करीन. "  - नलिनी

" नलिनी मी आईला इथे अस सोडून , तुझ्या सोबत कसे काय येऊ... तिला एकटीला सोडून मला नाही जमणार ग ... खरंच सॉरी नलिनी " - इशा

" तू वेळ घे आणि विचार करून सांग, अगदी थोडेच दिवस , तुला आवडेल बघ. " - नलिनी

" चला या ग, चहा प्यायला या बाहेर, इशा... नलिनी ... " - सुनीता

दोघी बाहेरच्या खोलीत आल्या. सुनीताने चहा आणि टोस्ट समोर ठेवले. मग तिघीच्या बराच वेळ गप्पा झाल्या. सुनीताला इशा बऱ्याच दिवसांनी हसताना दिसली. तिला असे आनंदी बघून सुनीताला बरे वाटले. नलिनीला सुनीताने घरी अधे मध्ये येण्यास सांगितले. पावसाचा जोर कमी झाला तसे नलिनीने इशाचा निरोप घेतला. पुढचे काही दिवस नलिनी वरचे वर इशाकडे येऊ लागली. दोघींच्या बराच वेळ गप्पा सुरु असायच्या. इशाच्या मनात तयार झालेली पोकळी नलिनीच्या येण्याने भरून निघाली होती. 

क्रमशः 

Thursday, August 14, 2025

भाग ८ : अकल्पित

म्हणता म्हणता दिवस सरले. अखेरीस तो दिवस उजाडला. इशा आणि प्रणित यांच्या भेटीसाठी अवघे काही तास शिल्लक होते. इशा छान तयार होऊन आली. पिवळ्या साडीत सुंदर वधू सारखीच दिसत होती.गुलाबी गाल आणि कपाळावर चंद्रकोर खुलून येत होते. पाहता क्षणी पसंती यावी असे रूप खुलून आले होते. इशाचे कुटुंब ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. इशाने ठरवल्याप्रमाणे या भेटीला जाताना ही आपली डायरी सोबत ठेवली होती.  रमाकांत आणि सुनीता ला जवळपास खात्रीच होती. आपली मुलगी लवकरच सासरी जाणार.  इशाला पाहून  रमाकांत च्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला तेव्हाच सुरुवात झाली. त्याच आनंदाने उत्साहाने ते कुटुंब आपल्या फोर व्हीलरने टिळकांच्या घराकडे निघाले.  

अचानक रमाकांतची गाडी चालवता चालवता शुद्ध हरपली. गाडी एका मोठ्या गाडीला धडकली. मागे बसल्याने इशा आणि सुनीताला फार लागले नाही. आजूबाजूला गर्दी जमू लागली. लगेच तिथं रुग्णवाहिनी आली आणि रमाकांतना रुग्णालयात घेऊन गेले. इशा आणि सुनीता खूप घाबरलेल्या स्थितीत होत्या. त्यांना काहीच सुचत नव्हते. त्यांच्या हाताला, डोक्याला लागून रक्त यायला लागले होते. रुग्णालयात गेल्यावर प्रथमोपचार सुरु झाले. इशा भानावर आली. डॉक्टर आले रमाकांतना तपासले. रमाकांतना डोक्याला जबरदस्त मार बसल्याने तिथेच त्यांचे प्राण गेले होते. ही बातमी डॉक्टरांनी इशाला सांगितली.  इशा कोलमडून जाणार तोच तिला आपल्या आईची आठवण झाली. सुनीता तिथे नव्हती आणि तिला ही गोष्ट सांगणे इशासाठी सोपे नव्हते. तेवढ्यात सुनीता खरचटलेल्या जखमावर औषध उपचार करून समोरून आली. इशाने आपली पूर्ण सहनशक्ती एकत्र करून ही दुःखद बातमी सुनीताला दिली. 

सुनीता जागीच बेशुद्ध पडली. सुनीताला ही तिथे ऍडमिट करावे लागले. इशा फार एकटी पडली होती. तिच्या कडे फोन ही नव्हता. कोणाचा फोन नंबर ही नव्हता. त्या पुढचे दोन दिवस इशा रुग्णालयातच राहिली. तिच्या सोबत फक्त तिची डायरी आणि थोडे पैसे होते. सुनीताच्या वोर्ड बाहेर बसल्या असताना तिने ती डायरी हातात घेतली तिने त्या डायरीची शेवटून पानं फाडायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. तेव्हा समोरून येणाऱ्या डॉक्टरांनी तिला पाहिले. हे तेच डॉक्टर होते ज्यांनी रमाकांतना तपासले होते. त्यांनी तिच्या शेजारी बसून धीर दिला.  ती दोन दिवस उपाशीच होती. ते तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होते. डॉक्टरांनी तिला खाऊ पिऊ घातले.  तिला सुनीता जवळ घेऊन गेले. सुनीता पूर्णपणे बरी होण्यासाठी इशाला ही परिस्थिती सांभाळणे किती गरजेचे आहे हे तासभर समजावून सांगितले. इकडे घरी दोन दिवस सतत फोन वाजत होता. रत्नाकर घरच्या फोनवर सतत फोन करत होते.   

घरी कोणीच नसल्याने काहीच संपर्क झाला नाही. शेवटी त्यांनी आपले प्रयत्न थांबवले. दुसऱ्या दिवशी रात्री  उशिरा सुनीताला शुद्ध आली. ती भानावर आली. रमाकांत आता नसल्याचे तिला समजले होते. मान्य होत नसले तरी ते वास्तव समोर उभे होते. तिच्या समोर इशा होती. तिच्याकडे पाहून सुनीताचा धीर परत आला. मनातली उमेद तळागाळाला गेल्या असताना इशाने आईला धीर दिला. सुनीता शुद्धीवर आल्यावर पुढच्याच दिवशी त्या दोघी आपल्या घरी आल्या. रुग्णालयातून निघताना इशाने तिला भेटलेल्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांना भेटून त्यांचा निरोप घेतला. घरी आल्यानंतर पुढचे चित्र दोघींना पण अस्पष्ट होते. 

इशा आणि सुनीता दोघीनी रमाकांतना शेवटचा निरोप देताना वचन दिले. आयुष्यात कितीही संकटे आली तरी एकमेकींच्या सोबत राहू. रमाकांतचे अचानक जाणे ही गोष्ट पूर्णपणे स्वीकारायला त्यांना जवळ जवळ महिना गेला. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मध्ये मोठा काळ जावा लागला. त्या दरम्यान रत्नाकर टिळक आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीच पुन्हा संपर्क केला नाही. इशा आणि सुनीता ही त्या काळात बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. रमाकांत बद्दल काही च कल्पना नसताना टिळकांचे कुटुंब पुन्हा त्यांच्या राहत्या घरी जर्मनीत परतले. इशा आणि सुनीतासाठी मात्र पुढे संघर्षाचे दिवस लिहून ठेवलेले होते. 

क्रमशः 

Wednesday, August 13, 2025

भाग ७ : डायरी

संध्याकाळी रमाकांतनी घरी आल्यावर सर्वात आधी रत्नाकर टिळकांना फोन केला. बराच वेळ रिंग झाल्यावर शेवटी टिळकांनी फोन उचलला. रमाकांतनी खुशाली विचारली आणि थेट मुद्द्यावर आले. ही आनंदाची बातमी ऐकून दुसरीकडे टिळक ही खुश झाले. पुढची चर्चा करण्यासाठी भेट व्हावी अशी दोघांची ही इच्छा होती. तसे नियोजन करून भेटण्याची तारीख आणि वेळ सुनिश्चित केली.

रमाकांतनी फोन ठेवला आणि फोन वर झालेले संभाषण घरच्यांना सांगण्यासाठी त्यांनी सुनीता आणि इशाला समोर बसायला सांगितले. रमाकांत पुढे बोलू लागले, 

" इशा माझे टिळकांशी बोलणे झाले, ते आपल्याला भेटण्यासाठी थेट जर्मनी हुन येत आहेत. ते त्यांच्या ठाण्यातल्या घरी येणार आहेत. आपल्याला त्यांनी तिथे भेटायला बोलावले आहे. ही भेट झाली कि लगोलग पुढच्या गोष्टी ठरवून ते पुन्हा जर्मनीत परतणार आहेत. त्यामुळे लग्नाची तारीख ही लवकरात लवकर काढावी लागेल. " - रमाकांत

" अरे बापरे एवढे लवकर, इशाला थोडा वेळ नको का द्यायला ... तिची सगळी उरली सुरली हौसमौज मला पूर्ण करायची आहे. उगाच घाई नको "  - सुनीता

" तुझं बरोबर आहे सुनीता पण आता भेटल्यावर त्यांचे कसे नियोजन आहे ते कळेल आपण आताच काही सांगू शकत नाही. आपण तयारीतच असायला हवं. " - रमाकांत

इशा तेव्हा काही बोलली नाही. तिने ऐकले आणि आपल्या खोलीत निघून गेली. 

तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आपले आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. अस्थिर आणि बदलणाऱ्या जगात आपल्याला पुढे जायचे आहेच तेव्हा आपण इथून असे काही सोबत न्यायला हवे जे या बदलणाऱ्या परिस्थतीमध्ये कायम आपल्या सोबत असेल तेव्हा तिला तिची डायरी आठवली. तिने मनोमन ठरवले ती डायरी आपण आपल्या सोबत कायम ठेवायची. 

ही डायरीच पुढे तिच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे हे तेव्हा तिला माहिती नव्हते. ती फक्त पुढच्या प्रवासाला लागली होती आणि तो प्रवास तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार होता. ज्याचा तिने विचार ही केला नसेल असे अनुभव ती घेणार होती. तिने त्या डायरीत त्या दिवशी ची तारीख नोंदवून ठेवली नंतर ती डायरी नेहमीच्या जागी ठेवून आणि जेवणासाठी बाहेरच्या खोलीत आली. 

क्रमशः 

Tuesday, August 12, 2025

भाग ६ : चहा आणि पोहे

नेहमीपेक्षा सकाळी लवकर इशाला जाग आली. अजून कोणीच उठले नव्हते. इशाने आज सर्वांसाठी चहा केला. किचनमध्ये काही तरी हालचाल सुरू आहे याचा सुनीताला अंदाज आला. आवरून ती किचन मध्ये आली तर चहा समोर तयार होता. इशा पोहे करण्याची तयारी करत असताना तिला दिसली. सुनीताने आश्चर्याने इशाला विचारले,

" आज लवकर उठून किचन मध्ये ! काय बनवणे चालले बाईंचे ? " - सुनीता

इशाने हातातले काम बाजूला ठेवले आणि सुनीता आणि तिच्यासाठी चहा कपात ओतला. वाफाळलेला चहा आयता हातात मिळाल्याने सुनीताच्या दिवसाची सुरुवात चांगलीच झाली. इशाने पोहे भिजवून ठेवले. इशा आणि सुनीता बाहेर बसून चहा पित बसले. त्यांच्यात नेहमीच्या गप्पा सुरु झाल्या. पुढे इशाने सुनीता कडे लग्नाचा विषय काढला आणि तिच्याकडून पुढे जाण्यास संमती दिली. 

सुनीताला कधी एकदा हे रमाकांतला सांगते असे झाले. चहा संपला. इशा पोहे करायला किचनमध्ये गेली. सुनीता पेपर वाचत रमाकांतच्या जागी बसली. बऱ्याच दिवसांनी सुनीताला असा निवांत वेळ मिळाला होता. तेवढ्यात रमाकांत तिकडे आले. सोफ्यावर बसले. सुनीताने तिच्याकडच्या पेपरचे एक पान त्यांच्याकडे सरकवले. सुनीताला पेपर वाचताना पाहून रमाकांत म्हणले,
 " किचनची जबाबदारी आज दुसऱ्यावर कोणावर तरी आहे असं दिसते. म्हणजे आज मला डबा इशाकडून मिळणार अरे वा..." 

" तस ही रोजच त्याच चवीचे खाऊन खाऊन कंटाळा आलाच होता " - रमाकांत

सुनीताने रमाकांतकडे नजर रोखली आणि म्हणाली " हो तर मला ही कुठे असा मोकळा वेळ मिळाला या आधी, सकाळी बसून निवांत पेपर वाचलेलं मला तर आठवत सुद्धा नाही.  "

" आज सकाळी सकाळी बाईसाहेब किचन मध्ये घुसल्यात आणि संपूर्ण किचनचा ठेकाच घेतला " - सुनीता

सुनीताने कमी आवाजात रमाकांतच्या जवळ येऊन इशाने होकार दिल्याची आनंदाची बातमी सांगितली. 
ते ऐकून रमाकांतला गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला. आकाश ठेंगणे वाटू लागले. त्याने इशाला बाहेर बोलावून घेतले. इशाने सर्वांसाठी गरमा गरम पोहे आणले आणि रमाकांतसाठी चहा आणला. 

" इशा, बस इकडे तुझ्याशी बोलायचंय आम्हाला. " 

" तुझ्यासाठी प्रणितचे स्थळ आले हे तुला आईने सांगितले असेलच, तू पूर्ण विचार करून निर्णय दिलास ना. तुझ्या मनाच्या विरोधात जाऊन आम्ही तुझं लग्न करणार नाही पण एक चांगला जोडीदार तुझ्यासाठी शोधण्याच्या नक्कीच प्रयत्न करू. तू खुश आहेस ना इशा ? - रमाकांत

इशाने रमाकांत कडे पाहिले. ती म्हणली,

" बाबा, आजवर मला काहीच कमी पडले नाही. हवे ते मिळाले. माझ्यासाठी तुम्ही आणलेल्या प्रत्येक गोष्टीला मी जपून ठेवले. त्यामुळे माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे. मी हा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहे. मी किती ही दूर असले तरी तुम्ही दोघे कायम माझ्या जवळ असणार आहात " 

" गुणांची माझी लेक... " सुनिताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. 

दोघांनी आवडीने प्लेटातले पोहे संपवले. रमाकांतने ही इशाचे कौतुक केले. " इशा असंच सासरी सर्वांना खुश ठेवायचं हं ... खूप स्वादिष्ट पोहे केलेस तू " 

" लवकरात लवकर आता रत्नाकर टिळकांना फोन करतो, पुढची बोलणी करायला हवी. वेळ नको घालवायला आजच संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर फोन करतो. " 

रमाकांतच्या मनात पुढचे नियोजन सुरु झाले. लग्नाची लगबग तेव्हा पासूनच सुरु झाली असे घरचे वातावरण झाले होते. पण हा प्रवास इतका सहज सोपा नव्हता...

क्रमशः 

Monday, August 11, 2025

भाग ५ : स्वप्नांचे मनोरे

सुनीता आणि रमाकांत इशाकडे बघून मनोमन खुश होते. तेवढ्यात सुनीताने विषय बदलला. " आज पाऊस पडणार बहुतेक... सकाळ पासून काळे ढग दिसत आहेत. वारा पण किती सुटलाय ! "
" इशा , आज संध्याकाळी कांदाभजीचा बेत करू , मस्त गरमा गरम चहा आणि कांदाभजी " - सुनीता

" हो हो, तस ही आज सुट्टी आहे, काही तरी स्पेशल हवेच, मी आईस्क्रीम आणतो, ईशाच्या आवडीचा फ्लेवर... स्ट्रॉबेरी " -  रमाकांत

इशाला  आई बाबांच्या बोलण्यावरून थोडा अंदाज आलाच, " आई बाबा आपल्या पासून काही तरी लपवत आहे. पण ते एवढे खुश आहेत म्हणजे काही तरी चांगलीच बातमी असणार. " ईशा च्या मनात विचारचक्र सुरु झाले.

दुपारी जेवण झाल्यावर इशा पुन्हा पुस्तक वाचायला बसली. इशाला वाचताना पाहून सुनीता तिथे आली. तिने इशाला विचारलं " काय वाचतेस इशा ? " 

" आई, हे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्यात एका दूरच्या प्रवासातले भन्नाट अनुभव दिलेत आणि काही चमत्कारिक गोष्टी एवढया छान प्रकारे सांगितलंय की मी ही तिकडे पोहोचते. थोडेच वाचून झाले. आताच सुरुवात केली. पण आता पूर्ण वाचूनच काढायचे मला. पूर्ण झालं की तुला सांगते त्यातली स्टोरी. " - इशा 

" हो सांग की, पण त्या आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, पुढे काय करायचं ठरवलं तू... पुढची परीक्षा देणार आहेस ना मग तो पर्यन्त काही ठरवले का ? - सुनीता

" हो आई, मला पुढे शिकायचे, मला अस पुस्तक लिहायचंय आणि ते इतरांनी वाचावे हे माझं स्वप्न आहे.  मी आता पासूनच त्याची तयारी सुरू केली आई, हे बघ वेगवेगळे कथा संग्रह त्यांची माहिती मी काढून ठेवली. ही सगळी पुस्तक मी वाचून काढणार..." - इशा

सुनीताने ती लिस्ट हातात घेतली आणि इशाला म्हणली " तुझं हे स्वप्न पूर्ण होईलच बाळा... पण त्या आधी तुला तुझी ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देणारा जोडीदार मिळावा अस आम्हाला वाटते. आम्ही तुझ्यासाठी असणारच आहोत पण एकदा तुझं लग्न झालं की आम्हाला ही समाधान मिळेल.  आपले हे कुटुंब आणखी मोठे होईल, तुला कळते ना , मी काय म्हणते ते इशा ? - सुनीता

सुनीताने मध्ये मोठा श्वास घेतला. आपल्या भावना ईशा समजून घेईन ना, तिच्या मनात आई बाबा बद्दल गैरसमज तर होणार नाही ना... ईशा यावर कशी प्रतिक्रिया देईल. असे बरेच प्रश्न तेव्हा उभ्या उभ्या सुनीताच्या मनात येत होते. ती ईशाकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न करत होती. ईशाने सुनीताकडे पाहिले.

" आई...मधेच काय हा लग्नाचा विषय काढतेस, माझे अजून शिक्षण पूर्ण नाही झाले आणि नोकरी पण नाही ... मग मला कोण स्वीकारेल ... तू घाई करतेस ग आई... " - ईशा

" तसे नाही इशा, तुला समोरुन स्थळ येते तर ते तू नाकारू नये, एवढंच आम्हाला वाटतं " - सुनीता 

" काय ? म्हणजे ? नीट सांग ना ग आई... " - इशा

" अग आपल्या शेजारी ते रत्नाकर टिळक राहायचे ना आधी, त्यांच्या धाकट्या मुलाचे स्थळ आले तुला... प्रणित नाव त्याचे , तुला आठवतोय का तो ? " - सुनीता

" हो आठवतो आई, पण मी त्याच्याशी नंतर फारसं बोलले नाही, किंवा पुढे संपर्क पण झाला नाही ... अजून त्यांना माझी आठवण कशी काय ? प्रणित तर किती मस्तीखोर होता तेव्हा , आता काय करतो तो ? " - इशा

सगळं कळेल बाळा पण आधी तुझं मत काय ते आम्हाला जाणून घ्यायचे तू तयार असशील तर आपण पुढे चर्चा करू " - सुनीता 

" पण आई माझं स्वप्न  ? " - इशा 

" ती सगळी मंडळी खूप चांगली, शिकलेली, सुजाण आहेत, तुला नक्कीच ते प्रोत्साहन देतील आणि आम्ही तुझ्यासाठी जे योग्य असेल तेच करू " - सुनीता 

" इशा  आम्हाला तुला आनंदात पहायचे एवढीच आमची दोघांची अपेक्षा आहे , आम्ही कायमस्वरूपी तुझ्या जवळ असणार नाही तेव्हा अडीअडचणीत तुला तुझी एक हक्काची जागा असावी जिथे तुला खूप प्रेम करणारी माणसे मिळावी एवढंच आमचं स्वप्न आहे. " - सुनीता

इशा आणि सुनीताचे बोलणे बराच वेळ सुरू होते. बघता बघता संध्याकाळ झाली. इशाला तिच्या आईचे म्हणणे पटू लागले. तिनेही मनोमन येणाऱ्या नव्या नात्याला होकार दिला. तेव्हा ती काहीच म्हणली नाही. विचार करण्यासाठी थोडा वेळ घेऊन तिने तो विषय तिकडेच थांबवला. 

थोडया वेळाने सगळे चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेण्यासाठी बाहेरच्या खोलीत येऊन बसले. इशाने ही दुपारी झालेला विषय पुन्हा काढला नाही. पण पुन्हा हा विषय समोर येणारच त्यामुळे तशी मनाची तयारी तिने केलीच होती. रमाकांत आणि सुनीता त्या दिवशी एवढे खुश होते, गेले अनेक दिवस तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर इशाने पाहिला नव्हता.

रात्रीचे जेवण आटोपले आणि इशा तिच्या डायरीत लिहायला बसली. तिनं कोणताही संपर्क नसताना ही प्रणित तिच्या आयुष्यात येण्याआधीचे त्याचे काल्पनिक वर्णन त्या डायरीत करून ठेवले आणि ती झोपली 

क्रमशः 

Sunday, August 10, 2025

भाग ४ : आनंदवार्ता

       रविवारची सकाळ... सुनीता आणि रमाकांत  चहा घेत बाहेरच्या खोलीत बसले होते. तेव्हाच घरचा टेलीफोन वाजला. ईशा गाढ झोपलेली. लताबाईंचे गाणे रेडिओ वर मंद आवाजात सुरु होते. सुनीताने चहा चे कप स्वयंपाक घरात नेले. रमाकांतनी तोवर फोन उचलला. फोनवर त्यांचे बराच वेळ बोलणे सुरू होते. एवढा वेळ फोन वर कोणाशी, काय बोलणे सुरू आहे त्याचा पडताळा करण्यासाठी सुनीता बाहेरच्या खोलीत आली. तिला पाहिल्यावर रमाकांत नी बोलणे संपवून फोन ठेवला. त्यांचा चेहरा आनंदाने खुलला होता. सुनीताने काही विचारण्याआधीच त्यांनी सांगायला सुरुवात केली. 

" अग ... ऐकलंस का ? आपल्या शेजारी पूर्वी राहायचे ते टिळक ... तुला आठवते का ? त्यांना दोन मुलं होती... नुकतेच जर्मनीला शिफ्ट झालेत ते..."  - रमाकांत

" हो हो... आठवलं , सुधीर आणि प्रणित त्यांची मुलं तेच म्हणताय का ? - सुनीता

" हो तेच ग ... त्यातल्या सुधीरचे लग्न झाले. त्यांची पूर्ण फॅमिली आता तिकडेच जर्मनीत असते. आणि तो प्रणित... बडबड्या, खोडकर - ईशाची लहानपणी सारखी खोडी काढायचा , तिच्या वेण्या सोडायचा लहानपणी, त्याच्या लग्नाचे बघतात आता, रत्नाकर टिळक त्याचे बाबा ... त्यांचा फोन होता " - रमाकांत

" अरे वा ... खूप दिवसांनी त्यांची आठवण काढलीत. पुन्हा जुने दिवस आठवले , काय म्हणतात, वहिनी कशा आहेत, सुधीर आणि प्रणित मोठे झाले असतील ना आता, तिसरी चौथीत असताना शेवटचे पाहिले त्यांना... आता समोर आले तर ओळखुन ही येणार नाहीत. " - सुनीता

" होय ते ही खरंच आहे, पण अग त्यांनी फोन या साठी केला की त्यांना ईशाला सून करून घ्यायचे आहे. प्रणित साठी त्यांनी आपल्या ईशाला विचार केला आहे. खरंच आजचा दिवस शुभ वार्ता घेऊन आला आहे. आपल्या ईशाला लग्नासाठी याहून अधिक चांगले स्थळ मिळणार नाही. " - रमाकांत

रमाकांतना बोलता बोलताच गहिवरून आले. त्यांचा चेहरा आनंदाने खुलला होता. सुनीताला ही तेवढाच आनंद झाला होता. दोघांनी ईशाच्या लग्नाचे स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. ईशा तो पर्यन्त उठली होती. 

" ईशाला इतक्यात नको सांगायला , योग्य वेळ बघून मी तिच्याशी बोलते. " - सुनीता 

" चालेल पण लवकरात लवकर तिला हे सांगायला हवे. पुढे टिळकांना तसे कळवावे लागेल आपल्याला ... ईशा तयार असेल तर लवकरात लवकर हे शुभ कार्य होऊन जाऊ दे. " - रमाकांत

ईशा हातात चहा चा कप घेऊन बाहेरच्या खोलीत आली. रेडिओ वर गाणी सुरू होती. आई बाबा एकमेकांना इशाऱ्यात काही तरी खुणावत असताना तिने पाहिले आणि विचारले.
" काय झालं बाबा... आज तुम्ही खुप खुश दिसत आहात... काय झालं ? " - ईशा

क्रमशः

Saturday, August 9, 2025

भाग ३ : पुस्तक


      ईशा आईसमोर काहीच बोलू शकली नाही. तिच्याकडचे शब्द जणू संपावर गेले होते. शांतता मोडत शेवटी नलिनीने ईशाचा निकाल आईला सांगितला. तिला के टी लागल्याचे कळल्यावर आईने तिला न ओरडता समजावले. ती निराशेच्या चक्रात अडकू नये म्हणून आईने मायेची फुंकर घातली. आईने ईशा अपयश स्वीकारले पण बाबा... त्यांना ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. ते काय विचार करतील ? त्यांना कोण सांगणार आणि त्यांना काय उत्तर द्यायचे ? असे प्रश्न ईशाच्या मनात होते. नलिनी थोड्या वेळाने तिथून निघून गेली. ईशा बराच वेळ शांतपणे तिच्या खोलीत बसली होती. तिच्या विचारांना थांबवणारे एकच माध्यम तिच्याकडे होते ते म्हणजे पुस्तक ... 

टेबलावर पडलेले पुस्तक तिने हातात घेतले आणि ती वाचू लागली. सुनीता मधून च येऊन तिच्या खोलीत डोकावून जात होती. तिच्या हातात पुस्तक पाहिल्यावर सुनीताचे चित्त शांत झाले. 

तिच्या हातात तेव्हा पुस्तक होते , द अलचेमिस्ट - पाउलो कोलिहो यांनी लिहिलेलं द अलचेमिस्ट. एका प्रवासी मुलाची कथा, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला भेटलेली वेगवेगळी माणसे आणि हा प्रवास करून त्याने गाठलेले अंतिम ठिकाण. त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्या पुस्तकात रंजकतेने सांगितला होता. 

ईशाने ते पुस्तक वाचायला आधीच सुरुवात केली होती. काही पाने वाचल्यावर मधेच थांबले. आज तेच पुस्तक तिच्या हाताला पुन्हा लागले आणि ती वाचू लागली. जिथे थांबलेली त्या पानापासून पुढे वाचू लागली. हळूहळू तिला हा प्रवास आवडू लागला. वाचता वाचता संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला. लाईट ही लावायची भ्रांत तिला राहिली नाही. शेवटी सुनीताने येऊन लाईट लावले. 

तिच्या खुर्चीजवळ आली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिने विचारले " ईशा ... बरी आहेस ना आता ? " 
" एक लक्षात ठेव, आपल्याकडून एक संधी गेली की असे समजायचे त्याहून मोठी संधी पुढे आपल्याला मिळणार आहे म्हणून या अडचणींना मोठे न समजता त्यातून नवीन मार्ग शोध... चुकले असेल तर सुधारणा कर मग निसटलेले पुन्हा एकदा मिळवता ही येईल " तिने पुस्तक टेबलावर ठेवले. आईकडे पाहून तिचा हरवलेला आत्मविश्वास जागा झाला. तिच्या मनाने निराशा झटकून पुन्हा उभे राहण्याची तयारी केली. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून ते सहज समोर आले. त्यांच्यातले बोलणे सुरू असतानाच अचानक दार वाजले. ईशाचे बाबा कामाहुन आले. सुनीताने बाहेर जाऊन दार उघडले. ईशा मागोमाग आली. बाबांनी आवरून आपली आराम खुर्ची धरली.  सगळे बाहेरच्या खोलीत बसले. नेहमीच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. अजून ही ईशाच्या निकालाचा विषय निघाला नव्हता. शेवटी निकालाचा विषय ईशाने च काढला. तिनेच धाडस करून तिचा निकाल बाबांना सांगितला. सुरुवातीला त्यांना ही तो धक्काच होता. नंतर त्यांनी थोडा वेळ घेतला आणि ईशाला समजून घेतले. कोणत्याही प्रकारचे वाद न घालता  बाबांनी तिला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले. 

आई वडिलांचा हा समजूतदारपणा ईशासाठी तेव्हा लाख मोलाचा झाला होता. तिने ही मनाशी ठरवून परत परीक्षा देण्याचे आश्वासन दिले. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. ईशाने पुस्तक वाचायला घेतले. रात्री बराच वेळ ती ते पुस्तक वाचत होती. दुसऱ्या दिवशी उशिरा उठल्याने आईने ते बरोबर हेरले. ईशाच्या हातातले पुस्तक, तिच्यावर आई बाबांचा असलेला अढळ विश्वास आणि भक्कम पाठिंबा या सगळ्यांची पुढे परीक्षा होणार होती.

क्रमशः 

Friday, August 8, 2025

भाग २ : निकाल

 ईशा बी. ए च्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. लवकरच तिचे शिक्षण पूर्ण होणार होते. परीक्षा नुकत्याच झाल्या आणि बघता बघता निकालाचा दिवस जवळ आला. ईशा तिच्या यंदाच्या निकालासाठी अतिशय ठाम होती. पेपर सगळेच चांगले गेले होते आणि तिचा आत्मविश्वास ही  आकाशाला भिडला होता. ईशा आज ही नेहमी प्रमाणे तिच्या डायरीत वेगवेगळ्या नोंदी करून ठेवत होती. तिला भेटलेल्या युनिक व्यक्तीला ती शब्दात उतरवत होती. कधी सिनेमात, कधी नाटकात तर कधी पुस्तकात ती त्यांना शोधत असे. असेच एक निराळे व्यक्तिमत्व तिला इंग्रजी कादंबरीत मिळाले. 

त्याचे वेगळेपण असे की हा एक लेखक होता. त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने खूप काही लिहून ठेवलेल्या गोष्टी होत्या, प्रसंग होते. पुढे कालांतराने त्याने लिहिलेले काही काल्पनिक प्रसंग त्याच्या समोर घडू लागले. त्याच्या सोबत ही घडू लागले. तोच त्याचा साक्षीदार होता.  त्याने लिहिलेल्या गोष्टी नुसार एकदा तो आणि त्याची बायको सोबत फिरायला गेल्या असताना अकस्मात त्यांचा अपघात झाला. अगदी त्याने शब्दात वर्णन केले त्याच प्रमाणे घडले होते. त्या नंतर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले तेव्हा त्याने लिहिलेलं हर एक पान त्याने वाचले आणि भूतकाळात घडलेले प्रसंग आठवले. योगायोगाने ते जवळ जवळ सारखेच होते. त्याची त्याला प्रचिती येत गेली. कालांतराने त्याला या गोष्टीचा पश्चाताप ही झाला. असा एक अवलिया लेखक तिला एका पुस्तकात मिळाला. तिने तो तितक्याच रंजकतेने लिहून काढला. लिहिलेली ही सगळी पात्र तिला काही सुचवत असायची. त्याचा ती मागोवा घेण्यात गुंतलेली असायची.

पाहता पाहता निकालाचा दिवस उजाडला. शेवटच्या सेमिस्टरचा निकाल लागला. ती उत्साहात कॉलेज मध्ये गेली. गेल्या गेल्या तिची मैत्रीण नलिनी वाटेत भेटली. तिने ईशा च्या नावापुढे एफ पाहिलेले, एफ म्हणजे फेल. हे तिने ईशा ला सांगितले. ईशाला तिच्या बोलण्यावर आधी विश्वास बसत नव्हता. तिने स्वतः पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. तिथेच ती रडू लागली.  एका पेपरमुळे हे अपयशाचे दुःख तिच्या पदरात पडले होते. नलिनीने तिला धीर दिला पण तिचे रडू थांबतच नव्हते. नलिनी तिला घरी घेऊन आली. घरी तिची आई कामात होती. हातातले काम सोडून ती बाहेर आली. ईशाचा पडलेला चेहरा पाहून तिने पहिला प्रश्न हाच विचारला " काय लागला निकाल ? काय झालं  ? " ईशा आणि नलिनी एकमेकींना पाहत होत्या. पण कोणीच काही बोलले नाही. क्षणभर घरात शांतता पसरली. 

क्रमशः 

Thursday, August 7, 2025

भाग १ : स्पर्धा

    ईशा कधीची कॉलेजमध्ये गेली. एव्हाना तिचे कॉलेज सुटलेले असते. तरीही अजून ती घरी आली नाही. घरी सुनीता आणि रमाकांत तिची वाट पाहत होते. सुनीता आणि रमाकांत  ईशाचे आई वडील. संध्याकाळचे साडे सात वाजून गेले. बाहेर काळोख झाला. सूर्य मावळला पण ईशा काही घरी परतली नव्हती. तेव्हा तिच्याजवळ कोणतेच संपर्काचे साधन नव्हते. त्यामुळे नक्की काय झाले, कुठे अडकली, संकटात तर नसेल ना अशा असंख्य प्रश्नांनी घरचे वातावरण बिघडले होते. 

ईशाचे कुटुंब हे मध्यम वर्गात मोडणारे कुटुंब. लहान सहान तडजोडी करत करत आनंदाने डोंबिवलीत राहत होते. ईशा ही शांत, मितभाषी आणि कोणाच्या अध्यात मध्यात न येणारी मुलगी, पुस्तकी किडाच. तिला लहानपणापासून चुकीच्या सवयी, संगती लागू नये म्हणून पुस्तकं वाचण्याची सवय रमाकांतनी तिला लावली होती. त्यांनी आणलेले प्रत्येक पुस्तक ती मन लावून वाचत. त्यावर ते तिची तोंडी परीक्षा ही घेत. काही पुस्तकं तिला एवढी आवडायची ती त्यांना प्रवासात सोबत ठेवत. 

तिची आणखी एक वेगळी सवय म्हणजे ती पुस्तकात वाचलेल्या आणि  तिला आवडलेल्या एखाद्या पात्राला लिहून ठेवत असतं. त्याचा पोशाख, चालणे बोलणे, त्याचा स्वभाव असं बरच काही. अशा बऱ्याचशा व्यक्तीरेखा तिच्या डायरीत तिने नोंदवून ठेवल्या होत्या. रोज रात्री ती आपल्या डायरीत ते लिहीत असत. 

त्या दिवशी ती घरी आली. घड्याळात नऊ वाजून गेलेले. आनंदाच्या भरात तिने सुनीताला हाक मारली. आपल्या हातातली डायरी सोफ्यावर ठेवली. आपली सॅक आणि हातातले सामान खाली ठेवले आणि बाबाजवळ येऊन बसली. 

रमाकांत घड्याळाकडे बोट दाखवत म्हणले " घर विसरली की काय आज तू ईशा ... किती वेळ झाला ? "

बाबांचा बोलण्यातला दटावण्याचा स्वर ओळखून ईशा थोडी घाबरली. तेवढ्यात आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. म्हणाली " कुठे होतीस ईशा... कळवायचे की नाही घरी, उशीर होतोय तर ... "

" आम्हाला किती काळजी वाटतं होती तुझी ! " 

ईशाने आपली सॅक जवळ घेतली आणि त्यातून एक पुस्तक काढले... म्हणाली,
" हे बघा ... मला बक्षीस मिळाले. कॉलेजमध्ये स्पर्धा होती, त्यात मिळाले. त्याचे बक्षीस वितरण होई पर्यंत उशीरच झाला. सॉरी बाबा "

" कुठली स्पर्धा, कशासाठी मिळाले ? " - रमाकांत

" अहो, बाबा... अभिवाचन करायचे होते आणि मी काहीच तयारी केली नव्हती ... त्या वेळी माझ्याकडे ही डायरी होती, डायरीतले एक पान वाचले. त्यासाठीच मिळाले बघा हे बक्षीस ..." - ईशा

" अरे वा .... छानच पण यापुढे एवढा वेळ बाहेर राहायचे नाही ईशा... लवकर घरी येत जा... कॉलेज झाले की घरी येऊन तुला जे करायचे ते कर...तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे... तुझी काळजी वाटते म्हणून सांगतो. " 

रमाकांतने कौतुक तर केले पण अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून कान ही धरले. जेवण झाले. ईशा तिच्या डायरीत पुन्हा काही तरी लिहायला बसली आणि थोड्याच वेळात डायरी बाजूला ठेवून झोपून गेली. 

क्रमशः 

भाग २५ : शुभ आरंभ

इशाने फोन उचलला. इशा बोलू लागली. " हॅलो " " हॅलो, इशा... मी प्रणित " " प्रणित, काय योगायोग आहे. आता तुझाच व...